‘महालक्ष्मी सरस २०२६’ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद

 महालक्ष्मी सरस २०२६'ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद : एकाच दिवसांत ६ कोटींची विक्रमी उलाढाल

• प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांच्या पाठबळाने १७ मे पर्यंत मुदतवाढ; आतापर्यंत ३२ कोटींची उलाढाल

• प्रधानमंत्री आवास योजनेतील ५ लाख घरकुलांचे लोकार्पण लवकरच- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती

मुंबई, दि. १३ - उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, खाद्यपरंपरा, हस्तकला आणि महिला उद्योजकतेचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत आहे.

ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना जागतिक ओळख, कायमस्वरूपी बाजारपेठ आणि मोठे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचे प्रदर्शन अधिक आधुनिक व आकर्षक स्वरूपात साकारले आहे. या संकल्पनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष मान्यता व पाठबळ दिले. त्यामुळे हे प्रदर्शन जागतिक दर्जाचे सांस्कृतिक व व्यावसायिक व्यासपीठ ठरत आहे.

राज्यभरातील लाखो महिला बचत गटांनी तयार केलेले दागिने, साड्यांचे कलेक्शन, बांबूच्या वस्तू, घरगुती सजावटीचे साहित्य, ग्रामीण कलाकुसरीचे नमुने येथे विक्रीसाठी आहेत. सेंद्रिय गूळ, पापड, लोणची, मसाले, चटण्या, पुरणपोळ्या आणि ग्रामीण भागातील खास खाद्यपदार्थांनाही मुंबईकरांची पसंती मिळत आहे. काही महिला उद्योजिकांच्या पारंपरिक लोणच्यांना किलोमागे हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. अनेक स्टॉल्सवरील ६० टक्क्यांहून अधिक माल काही दिवसांतच विकला गेला.

९ मे रोजी एका दिवसात ६ कोटी रुपयांची विक्री झाली. आतापर्यंत प्रदर्शनातून ३२ कोटींची उलाढाल झाली असून, यंदा ५० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी नागपूरला १६ कोटी व वाशी येथे २२ कोटींची उलाढाल झाली होती. मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता प्रदर्शनाची मुदत १७ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

शाश्वत बाजारपेठेसाठी ‘उमेद मॉल’

महिलांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी विक्रीचे व्यासपीठ मिळावे यासाठी ‘उमेद मार्ट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मसोबतच ‘उमेद मॉल’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचे काम सुरू असून, भविष्यात तालुका स्तरापर्यंत विस्ताराचे नियोजन आहे. चालू वर्षात १३ उमेद मॉलचे काम सुरू होत असून पुढच्या एका वर्षात ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक मॉल किमान २० हजार चौरस फुटांचा असेल.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी आणि जागतिक स्वरूप देण्यासाठी दिल्लीच्या मित्तल कंपनीची मदत घेण्यात आली. अधिकाऱ्यांसोबत त्यांनीही चांगले काम केले आहे.

सुविधा

संपूर्ण परिसर वातानुकूलित असून स्वतंत्र एसी फूड कोर्ट, डिजिटल थीम पार्क आणि होम डिलिव्हरी सुविधा यंदा प्रथमच उपलब्ध आहे. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर सुविधा आणि वांद्रे पूर्व व कुर्ला पश्चिम स्थानकांवरून मोफत बस सेवा आहे. शनिवार-रविवारी १५ ते २० हजार नागरिकांची उपस्थिती असते.

उमेद अभियानाची यशस्वी वाटचाल

सन २०११ पासून अभियानाची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून ३४ जिल्हे, ३५१ तालुके आणि ३१,५७८ गावांमध्ये उमेद पोहोचले आहे. ६६ लाख ग्रामीण कुटुंबांचा सहभाग असून ६ लाख ७० हजार स्वयं सहायता गटांची स्थापना झाली आहे. बँकांमार्फत बचत गटांना ५०,१५० कोटींहून अधिक कर्जवाटप, तर समुदाय निधी स्वरूपात ४,६४० कोटींचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यात ५० लाख लखपती दीदी तयार झाल्या असून, मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली १ कोटी लखपती दीदी घडविण्याचे उद्दिष्ट आहे. ‘उमेद मार्ट’वर सुरुवातीला ४,२०० उत्पादने उपलब्ध असून अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्टसोबत विक्री वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण

राज्यास टप्पा १ अंतर्गत सन २०१६-१७ ते २०२२-२३ पर्यंत १३,११,६९९ घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. त्यापैकी १००% म्हणजेच सर्व घरांना मंजुरी मिळून १२,८४,२२९ घरकुले पूर्ण झाली आहेत. सन २०२४-२५ मध्ये राज्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये ६.३७ लाख, डिसेंबर २०२४ मध्ये १३.२९ लाख तसेच पीएमजनमन अंतर्गत ४५,७७० आणि सन २०२५-२६ मध्ये १० लाख असे मिळून एकूण ३० लाख इतके देशातील सर्वाधिक उद्दिष्ट मंजूर झाले. त्यापैकी २७,८६,८५३ घरांना मंजुरी असून ५,०८,२६७ घरकुले पूर्ण झाली आहेत, तर २२,७८,५८६ प्रगतीपथावर आहेत.

मागील एका वर्षातच ५,०८,२६७ घरकुले पूर्ण करण्याची विक्रमी कामगिरी झाली. या ५ लाख घरकुलांचे लोकार्पण केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान व मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रासाठी सुमारे १०,००० कोटी निधीची घोषणा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करून ३० लाख नव्या घरकुलांचे उद्दिष्ट मिळवले.

“मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यासाठी आभार. एक कोटी लखपती दीदी बनविण्याचे लक्ष मुख्यमंत्र्यांनी दिले, आम्ही त्या दिशेने वाटचाल करीत आहोत. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकत आहोत,” असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

कोल्हापूर फिल्म कंपनी 'विठ्ठल दर्शन' अभिनेते जितेंद्र जोशी सादरीकरण करणार

Anand Rathi Share & Stock Brokers...

BlueStone Jewellery & Lifestyle IPO